मुख्य सामग्रीवर वगळा

देऊळ...ज्याला देव हवा आहे, त्याने तो आपापला शोधावा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात असणारी बारीक रेष दिवसेनदिवस अधिकच धुसर होत चालली आहे. भॊतिकसुखांसाठी आसुसलेला समाज, त्यात न संपणारी स्पर्धा यात थकून जाऊन मनुष्य आध्यात्मिकतेकडे ओढला जाउ लागला.  ज्या गोष्टीला ग्राहक वर्ग त्या गोष्टीचे बाजारीकरण नसते झाले तर नवलच म्हणावे लागले असते. यातूनच पुढे देवदेवता नि त्यांची ठाणी ह्या बाजारीकरणाच्या विळख्यात पुर्णपणे अडकली. आज नवनवीन तयार होणारी श्रद्धास्थानं नि त्या ठिकाणी मांडलेला बाजार ह्याचे समर्पक चित्रण लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी प्रेक्षकापर्यंत उत्तमरित्या पोहचवतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर उपहासात्मक टिपण्णी करतानाच, जागतिकीकरणाच्या उठलेल्या वादळात भरकटलेले गाव-खेड्यातील जीवन, शहरीकरण नि चंगळवाद यासाठी झपाटलेली खेड्यातील तरुणाई ....... याची चांगलीच फोडणीही चित्रपटाला दिली आहे.


सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं पिवळं सोनं ....... पाणी नसेल तरी बहारदार तोर्‍यात हलणारं ते पिवळ गवत नि ती ऐन दुपारची वेळ ....... उन्हं किती कडक याचं चित्रण एकदम झकास!..... जी मुलं नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी जातात ना त्यांना नेहमी ही उन्हं, ते पिवळ गवत नि उजाड डोंगर याचीच सवय होऊन जाते.... नि काहींना ते मनापासून आवडू लागतं........गिरीश कुलकर्णीना ही सवय नि ती आवड असावी... म्हणूनच ही पिवळाई ....... switzerland च्या हिरवाई वर मात करते नि जास्त सुंदर नि आपली वाटते.

माळरानात हरवलेली गाई शोधणारा केशा ......... माळरानाच्या पाठी पुरातत्व विभागाचे चाललेले खोदकाम......नि पुन्हा माळरानात हरवलेली गाई शोधणारा केशा ...... सापडते एकदाची पण आणखीही काही सापडतं .... उंबराच्या झाडाखाली देवदर्शनाचा साक्क्षातकार झालेला केशा गावात सैरावैरा धावू लागतो......नि सुरु होते कथा. पहिल्या दोनच मिनिटात आपणही कथेबरोबर प्रवाही होऊन जातो.

गावात सर्वाचे आदरस्थान असलेले अण्णा (दिलीप प्रभावळ्कर) यांच्या मार्गदर्शनाखाली....... गावात चांगला मान असलेले गावातील मुख्य राजकारणी भाउ गलांडे (नाना पाटेकर)  हे रुग्णालया सारखी चांगली कामं राबवण्याच्या प्रयत्नात ...... तर दुसरीकडे रिकामटेकडे पणा करत फिरणारी तरूणाई ........ मग ह्या मंडळीना केशाला जिथं देव दिसला तिथं देऊंळ बांधण जास्त महत्वाचं वाटतं.......  श्रमदानातून उभारलं जाणारं रुग्णालयं केव्हाच बाजूला पडतं...... सुरु होतो देऊळ, देव, श्रद्धा नि टेंडर यांचा तमाशा....... परिस्थितीला अनुरुप गाणं येतं ..... Welcome हो राया Welcome ..... आमच्या गावी Welcome

मग काय मोठ्या सेलिब्रिटी काय राजकारणी काय सर्वांचच वेलकम नि त्यातून पैशाचंही. पूर्वी नेहमी देऊळात जाणारी केशाची आई... आठ आठ दिवस देवळात जाईनाशी होते. पूर्वी आपुलकिने केशाला चहासाठी बोलावणारी नि गाई बरोबर निरागस पणे गप्पा मारणारी भाऊंची बायको ...... एव्हढी बिझी होऊन जाते कि तिला त्याच गाईच्या आजारपणाची खबर देणार्‍या केशाशी बोलायलाही वेळ नाही........

केशाला या सगळ्याची वेदना असह्य होते नि तो अस्वस्थ होऊ लागतो. अत्यंत वेगात आलेलं कथानक इथे मात्र रेंगाळु लागतं. ...... आता काय पुढे .... त्यात जरा कमी पडते. वेग मंदावतो. जे चालू आहे ते फक्त केशाला योग्य वाटतयं बाकी कुणालाच नाही. यातच मग आपला थोडा का होईना अपेक्षाभंग होतो. जो विषय लेखक/दिग्दर्शकाने धाडसाने हाताळला आहे .....ते मुळातच अवघड जागेचं दुखण. समाजाला त्यांच ह्या प्रकारे खुलं प्रर्दशन नको आहे. पण ही धाडसी हाताळणी त्या समस्येवर उत्तर मात्र अगदी पळपुटेपणाचं देते 

तसा केशा हा पिक्चरचा हिरो पण कथा हाच प्राण असणार्‍या जातकुळीतील हा सिनेमा मात्र प्रत्येक नि प्रत्येकच व्यक्तिरेखा फुलवतो.........प्रत्येक फ्रेम खूपच सुंदर. ........केशाला जे सापडतं नि त्यातून गावात सुरु होणारी धावपळ (धावपळीचं नि त्या पुर्वीचं) भन्नाट चित्रण. गावातील प्रतिष्ठीत राजकारणी भाउ नि त्यांची बायको (नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी) त्याचं घरं ... त्यांचा पुतण्या ... त्याचे रिकामटेकडे मित्र .....सरपंच तिचं घर....केशाचं नि त्याच्या होणार्‍या बायकोचं बाजुबाजुला असणारं घर... केशाची आई.. सगळ्यांचेच बारीक पैलु, खास करुन गावात पोहचलेले शहरीकरण.......आपल्या समोर लेखक नि दिग्दर्शक मोठ्या खुबीने सादर करतात. (यासाठी का होईना पण हा सिनेमा बघाच एकदा. कारण ती खरीखुरी गोधडी...कापडं.....चहाची टपरी....कानावर असणारं ते चायना प्रोडक्ट ह्या प्रकारे अगदी खरं गावं क्वचितच तुम्हांला इतर सिनेमात दिसेल)

कलाकार : अभिनय कुणीच केला नाही.....सगळेच अक्षरशः व्यक्तिरेखा जगलेत.

गाणी : अगदी योग्य नि फक्त योग्य वेळीच वाजत राहतात बैकग्राऊंडला.

विशेष उल्लेखनिय : दिग्दर्शन नि लेखन

(आणि हो ... संपूर्ण चित्रपटात व्हिलन नाही...... ऐव्हढी ती संपूर्ण गावात माणसं पण त्यांना चांगल वाईट दाखविण्या ऐवजी लेखक प्रत्येकातील स्वभावाचे एक एक पैलु अलगद आपल्यासमोर मांडतो. .............. .......... लार्जर दैन लाईफ ची सवय लागलेल्या आपणा सर्वाना ह्या गोष्टी पचायला सोप्या जातात. त्यातच दिग्दर्शकाचं यश सामावलं आहे)

अजूनही बरचं काही आहे.






टिप्पण्या

  1. संपुर्ण लिखाण तर मनापासून पटलच पण
    >>कलाकार : अभिनय कुणीच केला नाही.....सगळेच अक्षरशः व्यक्तिरेखा जगलेत.

    हे अतिशय आवडलं!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा